बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

इंदापुरात राजकीय भूकंप, हर्षवर्धन पाटलांना तीन जिवलग सहकाऱ्यांचा रामराम, कोणत्या पक्षात जाणार?

हर्षवर्धन पाटील समर्थकांनी धक्का दिल्यानंतर इंदापूर तालुक्याचे राजकारण पूर्णपणे नव्या समीकरणांच्या दिशेने वळण्याची चिन्हं दिसत आहेत.

इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा आठवडा राजकीयदृष्ट्या अत्यंत धक्कादायक ठरत आहे. त्यांच्या गोटातील तीन जिवलग सहकारी आणि राजकीय शिलेदार माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, हर्षवर्धन मोटार वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ राऊत आणि माजी नगरसेवक गोरख शिंदे हे तिघेही आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गोटात जाणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.

या तिघांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत येत्या दोन दिवसांत मुंबईत औपचारिक पक्षप्रवेश होणार आहे. या प्रवेशानंतर इंदापूर तालुक्याचे राजकारण पूर्णपणे नव्या समीकरणांच्या दिशेने वळण्याची चिन्हं दिसत आहेत.

हर्षवर्धन पाटील यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या या तिन्ही नेत्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात तडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इजगुडे, राऊत आणि शिंदे या तिघांची कार्यकर्त्यांमध्ये मजबूत पकड असून, ते स्थानिक निवडणुका आणि संघटनात्मक पातळीवर पाटील यांच्यासाठी नेहमीच ‘फिल्ड जनरल’ म्हणून काम करत होते. त्यामुळे या तिघांचे पलायन पाटील यांच्या संघटनेला मोठा धक्का ठरू शकतो.

इंदापूरचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाटील गटातील असंतुष्ट नेत्यांशी सातत्याने संपर्क ठेवला होता. या हालचालींना अखेर यश मिळाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भरणेंच्या या राजकीय डावपेचामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये समीकरणे बदलू शकतात. या घटनाक्रमामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. पाटील समर्थकांमध्ये असंतोष आणि नाराजीचे वातावरण असून, पुढील काही दिवसांत आणखी काही नावे भरणे गोटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

आगामी निवडणुकांवर थेट परिणाम
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील स्पर्धा नेहमीच काट्याची राहिली आहे. मात्र या तिन्ही शिलेदारांच्या जाण्याने पाटील यांची ताकद कमी होईल आणि भरणेंचे वर्चस्व आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेचा सूर स्पष्ट आहे. दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यावर निर्णायक मात देण्यासाठी ही अतिशय आखीव-रेखीव चाल खेळली आहे.

Share it :