मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात नाराजी पसरल्याने, सरकार ओबीसींच्या विकासासाठी महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष असतील, तर छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यासह आठ मंत्री सदस्य असतील. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी ही समिती धोरण तयार करणार असल्याचे वृत्त आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठ्यांनी मुंबई गाठली होती. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली होती, तर मराठा समाजही आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाला. यावर तोडगा काढण्यासाठी नियुक्त केलेल्या उपसमितीने जरांगेंच्या मागण्यांचा अभ्यास केला त्याच पार्श्वभूमीवर सरकारनेही जरांगेंच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मराठा आंदोलनासाठी ठोस पाऊल उचलणार असल्याची हमी मराठा समाजाला दिली. यातच मात्र ओबीसी समाजात मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. ओबीसी समाज मराठ्यांचा ओबीसीकरणाला सुरुवातीपासून विरोध करत आहेत, जो सध्या आणखी तीव्र झाला आहे. यामुळे सरकारने ओबीसींसाठीही महत्वाचे पाऊल उचलले आहे.

ओबीसी साठी उपसमिती : सरकार ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणार आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह आणखी आठ मंत्री समितीचे सदस्य असणार आहेत.
ओबीसी समाजाच्या विरोधानंतर सरकार हे पाऊल उचलताना दिसत आहे. ओबीसींमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. यातच मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार एकप्रकारे सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. ओबीसींना दिलासा देण्यासाठी सरकार विकासात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ओबीसींच्या विकासासाठी उपसमिती गठीत करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाबाबत कार्यक्रम आखण्यात येणार आहेत. यांसंबंधित योजनांबाबत ही समिती कामकाज पाहणार असल्याचे वृत्त आहे.
समितीचे कोण कोण असणार सदस्य?
भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद असणार आहे. तर या समितीत भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे समितीचे सदस्य असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.